फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।– “चरित्रच चारित्र्य घडवतं, त्यागातून प्रेम जन्मतं, आणि प्रेमातून देवही साकारतो”, या सशक्त विचारातून महामंडलेश्वर प. पू. जनार्दन हरिजी महाराज यांनी बामणोद येथे आयोजित संगीतमय श्रीरामचरितमानस कथेदरम्यान उपस्थितांना अध्यात्मिक आणि सामाजिक जाणिवेने भारावून टाकले.
प. पू. जनार्दन महाराज म्हणाले, “प्रभू श्रीरामाचे चरित्र हे आपल्या भारत देशाचा आत्मा आहे. युवकांनी तरुण वयातच अशा थोर व्यक्तिमत्त्वांचे चरित्र अंगीकारले, तर जीवन अधिक सुफळ होईल.”
त्यांनी रामायणातील प्रसंगांचे उदाहरण देत सांगितले की, प्रभू राम आणि त्यांच्या सहवासातील प्रत्येक पात्र हे त्याग, निष्ठा, प्रेम आणि कर्तव्य शिकवणारे आहे. अशा आदर्शांनी प्रेरणा घेतल्यास मानवी जीवन अधिक उजळू शकते.
कथेनंतर महाराजांनी समाजातील काही वर्तमान वाईट प्रवृत्तींबाबत परखड भाष्य केले. “विवाहासारख्या मंगल प्रसंगी दारू पिऊन लग्न अडवणारे मित्र नव्हे, तर शत्रू असतात,” असे ते म्हणाले.
त्यांनी विशेषतः युवकांना उद्देशून सांगितले की, “मित्रत्व म्हणजे जबाबदारी. आपल्या मित्राच्या आयुष्यातील अत्यंत पवित्र क्षणी त्याला आधार द्या, वेळ सांभाळा, आणि संस्कृती जपा.”
मुलींनाही महाराजांनी खऱ्या सौंदर्याविषयी जागरूकतेचे आवाहन केले. “बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणाचे सौंदर्य टिकणारे आहे. आपल्या आजी–माजी पिढ्यांमध्ये शालीन, सोज्वळ सौंदर्य होते. तेच आदर्श ठेवा,” असा सल्ला त्यांनी दिला.
महाराजांनी सांगितले की, आपल्या ऋषीमुनींनी आणि शास्त्रांनी दिलेली परंपरा, विचार, आणि धर्म ही केवळ आचारसंहिता नसून जीवनाची दिशा आहे. त्यांनी उपस्थितांना विचारले, “आपण देवावर विश्वास ठेवतो, पण त्याचा प्रत्यक्ष आचरणात उपयोग का करत नाही?” त्यांनी असेही नमूद केले की, धार्मिक समारंभांमध्ये नियम, संयम आणि श्रद्धेचा आधार हवा, केवळ देखावा नको.