Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावात समस्यांचा पाढा ; नागरिक त्रस्त

मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावात समस्यांचा पाढा ; नागरिक त्रस्त

0
19


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावामध्ये विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. संडास बांधकाम, गुरांचा हौद, समाज मंदिर परिसरातील अस्वच्छता, गटारींची दुरवस्था आणि पावसाळ्यात घरांमध्ये शिरणारे सांडपाणी अशा अनेक समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार समस्या निदर्शनास आणून देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

गावाच्या प्रवेशद्वाराजवळ निश्चित जागेवर आधीपासून संडासची व्यवस्था असतानाही त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने संडास बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात इतर ठिकाणी जागा उपलब्ध असताना त्याच परिसरात पुन्हा बांधकाम करण्याचे कारण काय, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रवेशद्वाराजवळील या परिसरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांसह गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गावातील गुरांच्या हौदाची अवस्थाही चिंताजनक असल्याचे नागरिकांनी सांगितले. हौदाची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यात पाणी नसल्याने गुरांसाठी असलेली ही सुविधा सध्या कोरडी ठण पडलेली असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांचा योग्य वापर आणि देखभाल होत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कुंड गावात धनगर समाजासाठी समाज मंदिर बांधण्यात आले आहे. मात्र, या समाज मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिक्रमण तसेच झुडपांनी व्यापल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसराची नियमित स्वच्छता होत नसल्याने समाज मंदिराचा वापर आणि त्याची देखभाल याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित यंत्रणेने पाहणी करून परिसर स्वच्छ करून अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

गावातील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे मेन नाल्याच्या पाण्याचा निचरा. गावातून जाणाऱ्या मुख्य नाल्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या समस्येची प्रशासनाकडून दोन ते तीन वेळा मोजणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप योग्य गटार अथवा नाल्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे मोजणी केल्यानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मोठ्या गटारीमध्ये झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले असून, साफसफाईअभावी पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणी निचरा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गटारींची तातडीने साफसफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

एकीकडे गावातील मूलभूत नागरी सुविधांची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे संबंधित समस्या सोडविण्यासाठी वारंवार मोजणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मोजणीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने प्रशासनाच्या दिरंगाईबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. समस्या नेमक्या कधी मार्गी लागणार आणि नागरिकांना मूलभूत सुविधा कधी मिळणार, हा प्रश्न सध्या कुंड गावासमोर उभा आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने कुंड गावाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून संडास बांधकामाचा प्रश्न, गुरांचा हौद, समाज मंदिर परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण, गटारींची साफसफाई आणि सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. विशेषतः नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आवश्यक गटार व नाला बांधकाम तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound