रेल्वे, बस सुरु ; मग मंदिरे का बंद ? ; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

पंढरपूर । सरकारकडून रेल्वे, मेट्रो आणि बसेस सुरू केल्या जातात मग मंदिरं का सुरू केली जात नाहीत?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचितच्या आंदोलनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर आंबेडकरांनी हा सवाल केला आहे. तर या आंदोलनास चांगला प्रतिसाद लाभला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आधी जाहीर केल्यानुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासह राज्यातील देवालये सुरू करण्यासाठी आज पंढरपुरात आंदोलन सुरू केले आहे. याआधी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सरकारने रेल्वे सुरू केल्या आहेत. बसेस-एसटी सुरू केल्या आहेत. आता तर मेट्रोही सुरू करण्यात येणार आहे. मग मंदिरं सुरू करण्यात सरकारला काय अडचण आहे. मंदिरं सुरू करण्याची सरकारने तारीख जाहीर करावी आणि एक नियमावली तयार करावी. संकट असल्याने भाविकांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा यावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, तोंडाला मास्क लावावेत आदी गोष्टीं त्यात समावेश कराव्यात, अशा सूचना मी सरकारला केल्या आहेत. या सूचना लोक मान्य करतील आणि त्याचं पालनही करतील. काही नियम आणि अटी घालून मंदिरं सुरू करावीत, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. ती त्यांनी मंजूर करावी, असं सांगतानाच मंदिरं बंद करून भाविकांचं भावनिक आयुष्य वेठीस धरणं योग्य नाही. सरकारपुढे मंदिरं सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले.

मंदिरं सुरू केल्यावर कोरोना वाढेल याचा काय तर्क सरकारकडे आहे?, संसर्गाची भीती व्यक्त करणारे त्यावर औषध देत नाहीत. आहे त्याच औषधांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. मृत्यूदरही नॉर्मल आहे. कोरोना नसतानाही आपल्याकडचा मृत्यूदर अधिक होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारने बसेस, रेल्वे आणि दुकाने सुरू केली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही. एसटी सुरू झाली तेव्हा पहिल्याच दिवशी २१ लाख लोकांनी प्रवास केला. पण त्यामुळे संसर्ग वाढल्याचं कुठंही आढळून आलं नाही. त्यामुळे मंदिरं सुरू झाल्यावर कोरोना वाढेल याचा सरकारकडे काय तर्क आहे ते स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पण संसर्ग वाढण्याबाबतचा त्यांचा आणि माझा दृष्टीकोण वेगवेगळा आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आंदोलक पंढरपुरात पोहोचले आहेत. नाकेबंदीमुळे वारकरी व वंचितचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने सुमारे एक लाख वारकरी पंढरपुरात आहेत. काल आंबेडकर सोलापूरला मुक्कामाला गेले होते. मोजक्या कार्यकर्त्यांसह नामदेव पायरीजवळ भजन करायची परवानगी द्यावी किंवा मोजक्या वारकर्‍यांसह मंदिरात सोडण्याची मागणी केली होती. आता यावर मुख्यमंत्री पातळीवर विचार सुरू असून आंबेडकर यांना मोजक्या वारकर्‍यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तर या आंदोलनात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Protected Content