कृषी विधेयके संमत करण्याच्या पध्दतीवर विरोधकांची नाराजी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने संसदेत ज्या पध्दतीत कृषी विधेयके संमत केली ते चुकीचे असल्याचा आरोप आज १८ विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन केला.

 १८ विरोधी पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली. त्यांनी राज्यसभेत कृषी बिले मंजूर करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत तीन विधेयके मंजूर न करण्याची विनंती केली. या बैठकीनंतर राष्ट्रपती भवनाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, राज्यसभेत मंजूर झालेले कृषी बिले घटनाबाह्य असल्याचे सांगितले. सभागृहातील गदारोळाला सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी राष्ट्रपतींना सांगितले की बिले असंवैधानिकरित्या मंजूर झाली आहेत. ही बिले मंजूर करु नयेत व ते परत पाठवावीत अशी विनंती केली. 

ते म्हणाले की, सरकारने कृषी विधेयके निवड समितीला किंवा स्थायी समितीकडे पाठविली नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. ते म्हणाले की राज्यसभेतील उपसभापतींनी बिलांवर मतदान घेण्याचे आमची मागणी नाकारली. ते म्हणाले की, सरकारने हे विधेयक समितीला पाठवले असते तर या विधेयकाचा फायदा शेतकऱ्यांना  झाला असता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणाले की, मतविभागणी झाली नाही, आवाजी मतदानही झाले नाही. ते म्हणाले की जर मतदान झाले असते तर आकडेवारी आमच्या बाजूने होती.

Protected Content