घरबसल्या तीन दिवसीय अहिराणी साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्याची संधी

औरंगाबाद प्रतिनिधी | ‘कोरोनाचे संकट वाढत असतांना विविध साहित्यिक कार्यक्रमापासून वंचित रहावं लागत असलेल्या वाचक, रसिक श्रोत्यांना घरबसल्या तीन दिवसीय अहिराणी साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आहे.

‘उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ’ संचलित ‘जागतिक अहिराणी भाषा परिषद संवर्धन परिषदे’च्या वतीने दुसरे ऑनलाईन अहिराणी संमेलन शनिवार, दि.२२ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले आहे.

शनिवार, दि.२२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनाची सांगता सोमवार, दि.२४ जानेवारी होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष विनायक पवार, डॉ.दौलत सोनवणे, कैलास पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘ओमायक्रॉन’च्या संकटावर मात करत सर्व सदस्यांना या संमेलनाच्या निमित्तानं साहित्यिकांच्या विचारधारेचा लाभ घेता येणार आहे.

राज्याचे अध्यक्ष विकास पाटील, जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे, प्रथम विश्व अहिराणी संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर, तसेच दुसऱ्या विश्व अहिराणी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.एस.के.पाटील आणि स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण या संमेलनात असणार आहेत.

संमेलनाच्या निमित्ताने अहिराणी, गुजर, लेवा, भिलाऊ, आदिवासी आणि ग्रामीण बोलीभाषेतील लेख, निबंध, कविता, चारोळ्या, वात्रटिका, विनोद, विडंबन आणि इतर साहित्य प्रकार ई-बुकच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा देखील मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन पुखराज पगारिया, प्रकाश बच्छाव, मिलिंद पाटील, जितेंद्र जोशी, संदीप भदाणे, पराग भामरे, योगेश शिंदे, प्रदीप पाटील, निलेश देसले, मनोहर सनेर, कांतीलाल महाजन, सतीश पाटील, बजरंग पाटील, गोरख चित्ता, दीपक चव्हाण, मनोज पाटील, अनिल देशमुख, वनमाला पाटील, माधुरी चौधरी, निशा काकडे आदींनी केलं आहे.

Protected Content