नवी दिल्ली-वृत्तसेवा । भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) मधील ९ अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या दहशतवादी ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले करत ठोस कारवाई केली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा ऑपरेशन राबविण्यात आला.
या ऑपरेशनमध्ये भारताने ज्या ठिकाणांना लक्ष्य केले त्यामागे ठोस कारणं आहेत :
बहावलपूर (पाकिस्तान – दक्षिण पंजाब) – संघटना: जैश-ए-मोहम्मद (JeM)
बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय आहे. याच संघटनेच्या नावावर २००१ चा संसदेवरील हल्ला आणि २०१९ चा पुलवामा आत्मघाती हल्ला झाले होते. त्यामुळे हे ठिकाण ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात मोठे लक्ष्य ठरले.
मुरीदके (लाहोरजवळ, पाकिस्तान) : संघटना: लश्कर-ए-तैयबा (LeT) – मुरीदके हे लश्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावा यांचे बेसकॅम्प असून २०० एकरांवर पसरलेल्या या भागात प्रशिक्षण, उपदेश आणि दहशतवादी कारवायांची लॉजिस्टिक तयारी केली जाते. मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते.
कोटली (POK) – कार्य: आत्मघाती हल्लेखोर व घुसखोरी प्रशिक्षण
कोटली येथे आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देणारे केंद्र असून, येथे एकावेळी ५० हून अधिक दहशतवाद्यांना तयार करण्याची क्षमता आहे.
गुलपूर (POK) कार्य : राजौरी व पुंछमधील हल्ल्यांचे लॉंचपॅड
गुलपूरला २०२३–२४ मध्ये जम्मू-कश्मीरमधील राजौरी व पुंछ भागांतील दहशतवादी हल्ल्यांसाठी लॉंचपॅड म्हणून वापरण्यात आले.
सवाई (POK) – कार्य: काश्मीर खोऱ्यातील हल्ले
सवाई हे सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम या उत्तर काश्मीर भागांतील हल्ल्यांशी संबंधित लश्करचे प्रशिक्षण केंद्र होते.
सरजाल व बरनाला (LOC जवळ) कार्य : घुसखोरीचे प्रमुख मार्ग
या दोन्ही ठिकाणी नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ आहेत व भारतात घुसखोरीसाठी वापरण्यात येतात.
महमूना (सियालकोटजवळ, पाकिस्तान) – संघटना: हिजबुल मुजाहिदीन
हिजबुल मुजाहिदीनचे हे ऐतिहासिक तळ असून सध्या थोड्या प्रमाणात कार्यरत असले तरी येथे अजूनही प्रशिक्षक व स्थानिक गुप्त नेटवर्क सक्रीय आहेत.
यासोबत शवाई नाला कॅम्प आणि सय्यदना बिलाल कॅम्प येथे देखील हल्ले करण्यात आले आहेत.
या सर्व ठिकाणांचा भारतातील दहशतवादी कारवाया व घुसखोरीशी थेट संबंध आहे. भारताने या दहशतवादी नेटवर्कच्या मुळावर घाव घालण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली लक्ष्ये होती. ऑपरेशन सिंदूर हे केवळ बदला घेण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य दहशतवादी योजनांचा पाया उद्ध्वस्त करण्यासाठीही राबवण्यात आले आहे.
भारताने यावेळीही सैन्य तळांऐवजी केवळ दहशतवाद्यांच्या आधारभूत केंद्रांवर अचूक लक्ष्य करत जगाला दाखवून दिलं की, भारत शांतता राखतो, पण गरज भासल्यास संयमपूर्वक आणि ठामपणे प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.