मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर उपजिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्यात यावेत असे निर्देश आ. चंद्रकांत पाटील यांनी दिले असून या संदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे.
जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर तालुक्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या भीषण उकाड्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यात तात्काळ उष्माघात प्रतिबंधक केंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे.
आमदार पाटील यांनी ६ मे रोजी तहसीलदार, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पत्र पाठवून, मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. उन्हाच्या झळांनी नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, वेळेवर उपचार मिळणे अत्यावश्यक आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
नागरिकांसाठी आरोग्यविषयक सूचना:
आमदार चंद्रकांत पाटील यांनी उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे:
कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणे टाळा
अनवाणी पायाने घराबाहेर पडू नका
दुपारच्या वेळेत बाह्य कामे शक्यतो टाळावीत
भरपूर पाणी प्या व शरीर हायड्रेट ठेवा
हलक्या व सूती कपड्यांचा वापर करा
अशक्तपणा किंवा चक्कर आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
कोणतीही व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळल्यास १०८ किंवा १०२ क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा
उष्णतेच्या वाढत्या प्रभावामुळे उष्माघातासारख्या गंभीर स्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज होत असून नागरिकांनीही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.