उरल्या फक्त दोनच सेना, एक भारताची सेना अन् दुसरी शिवसेना : राऊत

नाशिक, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वतंत्र भारताच्या इतिहासात अनेक सेना आल्या तरी फक्त भारताची सेना आणि शिवसेनाच टिकली असल्याचे सांगत गद्दारांना जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा खासदार संजय राऊत यांनी केला. ते येथील मेळाव्यात बोलत होते.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये उभी फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राज्यभरातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे. यासोबत संजय राऊत यांनी नाशिक येथे ठाण मांडले असून आज त्यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधीत केले. त्यांनी गद्दारांवर जोरदार हल्लाबोल करत खरा शिवसैनिक हा आमच्यासोबतच असल्याचे ते म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी करणारे संपतात हा इतिहास आहे. शिवसैनिकांचे हायकमांड हे मातोश्रीवर आहेत. मात्र शिंदेंनी भाजपला हायकमांड मानले. आज राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आमच्या सोबतच आहेत. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. असंख्य महिलांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. या अश्रूंच्या महापुरात गद्दार वाहून जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तर स्वतंत्र भारतात शेकडो सेना स्थापन करण्यात आल्या तरी फक्त भारताची सेना आणि शिवसेनाच टिकल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Protected Content