आता कुठे गेले ‘मुलुंडचे पोपटलाल’ ? : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी न्यू इंडिया बँक लुटीत भाजपचा सहभाग असल्याचा आरोप केला आणि “मुलुंडचे पोपटलाल कुठे गेले?” अशा तीव्र शब्दांत प्रश्न विचारले.

राऊत यांनी म्हटले, “मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली गेली आणि त्यात भाजपचे लोक सामील आहेत. आता मुलुंडचे पोपटलाल कुठे गेले? एवढी मोठी बँक लुटली गेली, पण हे पोपटलाल आता का बोलत नाहीत? कोणत्या बिळात लपले आहेत?” त्यांनी भाजपवर आरोप केला की, बँक लुटीत सामील असलेल्या लोकांना सत्ताधारी पक्ष संरक्षण देत आहे.

त्यांच्या टीकेचा फोकस केवळ बँक लुटीपुरता मर्यादित नव्हता. राऊत यांनी बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उठवले. ते म्हणाले, “बावनकुळे आणि फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही? हे ठरवण्याची जबाबदारी अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी.”

मराठा आंदोलनाच्या संदर्भातही राऊत यांनी भाजपवर आरोप केले. त्यांनी सांगितले, “मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धस यांना मोहरा म्हणून वापरले. त्यासाठी संतोष देशमुख खून प्रकरणाचा उपयोग केला गेला. पण सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात असे का केले गेले नाही?”

न्यू इंडिया बँक प्रकरणावर बोलताना राऊत यांनी विचारले, “भाजपातील लोकांनी बँक लुटली, पण ते आता का बोलत नाहीत? हा गरिबांचा किंवा सामान्य माणसाचा पैसा नाही, तर टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही बँक आहे. आता ते इकडे का जात नाहीत? ईडीला का सांगत नाहीत? आता का पत्रकार परिषद घेत नाहीत?” संजय राऊत यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Protected Content