रावेर एसटी डेपोला नवीन बसेस देण्याची मनसेची मागणी

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर तालुकाध्यक्ष संदिपसिंह हरबारसिंह राजपूत यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रावेर एसटी डेपोला नवीन दहा ते वीस बसेस देण्याची मागणी करत अर्ज सादर केला आहे.

परिवहन मंत्र्यांना दिलेल्या अर्जात राजपूत यांनी नमूद केले आहे की, रावेर एसटी डेपोमध्ये सध्या ५५ बसेस उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी १५ बसेस पूर्णतः जीर्ण झाल्या असून दररोज सुमारे १८,००० प्रवासी या डेपोमधून प्रवास करतात. बस कमतरतेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

रावेर एसटी डेपो हा जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. हा डेपो महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असून येथून कल्याण-डोंबिवली, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांसह विविध भागांमध्ये बसेस धावतात. याशिवाय, पंढरपूर, अक्कलकोट, शिर्डी, शिंगणापूर आणि तुळजापूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही रावेर डेपोमधून नियमित बस सेवा उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पास सुविधा असून ग्रामीण आणि शहरी भागांतील शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची वाहतूक सेवा आवश्यक आहे. मात्र, बस कमी असल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नवीन बसेस आण्याची मागणी या निवेदनात करण्यात आले आहे.

संदिपसिंह राजपूत यांनी २०२२-२३ पासून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य परिवहन महामंडळ जनतेसाठी किफायतशीर, नियमित आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बस उपलब्धतेवरील ताण वाढला असून नवीन बसेस मिळाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल. राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, “रावेर एसटी डेपोमधून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बस कमतरतेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन २० बसेस उपलब्ध झाल्यास सेवा अधिक कार्यक्षम बनेल.” रावेर तालुक्यातील जनतेसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, नवीन बसेस मिळाल्यास प्रवासी सेवेतील अडचणी दूर होतील आणि नागरिकांना अधिक सोयीस्कर प्रवास अनुभवता येईल, अशी आशा राजपूत यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content