हतनूर कालव्यामुळे यावलवरील पाणी टंचाईचे सावट दूर

hatnur canal yawal

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी आमदार हरीभाऊ जावळे यांनी हतनूरच्या कालव्यातून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याने टंचाईचे सावट दूर झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट यावलकरांसमोर निर्माण झाले होते. या पाण्याच्या संकटात यावल शहरातील काही पाणी व्यावसायिकांनी आपला चांगला व्यवसाय करून घेतला. तर अनेकांनी सामाजिक पातळीवर मदतदेखील केली. पन्नास हजाराच्यावर पहोचलेल्या यावल शहराच्या लोकवस्तीला मागील दोन महीन्यांपासुन पिण्याच्या पाण्याच्या संकटाने चांगलेच ग्रासले होते. त्यात जुन चा महीना संपता संपता हतनुर धरणातील जलसाठाही संपल्याने यावल शहरात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली होती. परंतु काही दिवसांच्या पावसामुळे हतनुर धरणात पाणी आले आहे. यामुळे यावल शहराची पाण्याची तिव्र टंचाई लक्षात घेता आमदार हरीभाऊ जावळे यांनी तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे हतनुर धरणाचे पाणी पाटचार्‍यांमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे.

यावल नगर परिषदचे नगरसेवक प्रा. मुकेश येवले, नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे, शिवसेनेचे शरद कोळी, सामाजीक कार्यकर्ते डॉ.युवराज चौधरी, यावल नगर परिषदचे व्हॉलमन दिलीप वाणी व गणेश बारी यांनी हतनूर कालव्याला लागून असणार्‍या व्हॉलच्या माध्यमातून पाणी सोडले. यामुळे यावल शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. सुरेखा शरद कोळी व प्रा. मुकेश येवले यांनी दिली आहे.

Protected Content