….राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे ? : निलेश राणे

मुंबई प्रतिनिधी । बीड अ‍ॅसीड हल्ल्याच्या प्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका करत हाथरसच्या नावाने गरळ ओकणार्‍या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

बीड येथील एका तरूणीला तिच्या प्रियकराने अ‍ॅसीड हल्ला करून जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली असून या माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. तर, या हल्ल्यातील तरूणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. यात आता भाजप नेते निलेश राणे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हाथरसच्या नावाने गरळ ओकणार्‍या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा प्रश्‍न विचारत भाजपा नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. बीड अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हाथरसवरुन राजकारण करणारे लोक आता कुठे गेले असाही प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. राज्यात सातत्याने महिलांवर अत्याचार होत असताना राज्य सरकार काहीही पावलं उचलताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत अशीही टीका निलेश राणे यांनी केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे की, बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.

Protected Content