नाझी फौजांचा पराभव होणारच : शिवसेनेचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप सत्तेचा दुरूपयोग करत असले तरी सत्ता गेल्यावर याचा बदला घेतला जाईल, असा इशारा देत नाझी फौजांचा पराभव होणारच असल्याची प्रतिक्रिया नवाब मलीक यांच्या कारवाईवर शिवसेनेने दिली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात आज नवाब मलीक यांच्या अटकेवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी ईडीने आता तुरुंगात टाकले आहे. ते केव्हातरी सुटतील. ते सुटतील तेव्हा भाजप आणि त्यांच्या नाझी फौजांसाठी अधिक धोकादायक ठरतील. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. २०२४ साली केंद्रातून मोदी, शहा आणि त्यांच्या ईडी, सीबीआय यासारख्या ’नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. त्यावेळी ’नाझी’ फौजांच्या सरदारांवर खटले चालवून तुरुंगात टाकले जाईल, अशा इशारा यातून देण्यात आला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे नवाब मलिक यांच्यावर देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केल्याचा आरोप करतात. हा प्रश्न चुकीचा नाही. दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत, इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपून ठेवले आहे. पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले. हिंमत असेल तर केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून दाऊदला खतम करावे अन्यथा फरफटत हिंदुस्थानात घेऊन यावे. पण हे लोक बार्बाडोसमधून भगोड्या मेहुल चोक्सीला भारतात आणू शकले नाहीत. तेथे दाऊदचे काय, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध आणि त्यांच्या नाझी फौजांविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडत होते. त्यामुळे नवाब मलिक यांना अटक करून भाजपविरुद्ध बोलणार्‍यांना ईडी, सीबीआयच्या फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना तुरुंगात पाठवण्याचा पणच केला होता. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर नाचणारे, तलवार नाचणारे पंटर्स आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ईडीच्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. या लढाईत भाजपने नेहमीप्रमाणे पाठीमागून वार केला आणि विजयी असल्याचा आव आणला. भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अशा तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतवण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे. नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना झुकणार नाही, लढत राहीन आणि जिंकेन, असा नारा दिला. त्यामुळे हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

 

Protected Content