


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील महानगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या आयुक्तस्तरीय लोकशाही दिनात नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारींवर थेट सुनावणी घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्राप्त झालेल्या चार ते पाच तक्रार अर्जांवर सविस्तर चर्चा करून संबंधित विभाग प्रमुखांना तातडीने आणि नियमानुसार कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. सुनावणीदरम्यान प्रत्येक अर्जदाराची बाजू समजून घेत तक्रारींचे स्वरूप जाणून घेण्यात आले. त्यानंतर संबंधित विभाग प्रमुखांना प्रकरणांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्यास सांगण्यात आले. अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी प्रलंबित तक्रारींवर विशेष भर देत, नागरिकांना अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक विभागाने तक्रारींच्या निराकरणाचा नियमित पाठपुरावा करून निर्धारित कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या लोकशाही दिनाच्या बैठकीला उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, उपायुक्त धनश्री शिंदे, मुख्य लेखापरीक्षक विजयकुमार सोनवणे, मुख्य लेखाधिकारी राजू लाकूडझोडे, संचालक (नगर रचना) अमोल पाटील, सहाय्यक आयुक्त संजय राऊत यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. महानगरपालिकेच्या लोकशाही दिनाच्या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल घेऊन त्यांचे वेळेत आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी अशा उपक्रमांना महत्त्व असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.



