पाचोरा नगरपालिकेच्या दुर्लक्षाने जारगावात जिंवत पाण्याचा झरा

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे जारगांवात जिवंत पाण्याचा झरा वाहतो आहे. लाखो लिटर पाण्याची नासाडीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल करीत कॉंग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

शहरातील सिंधी कॉलनी, कृष्णा पुरी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जारगांव शिवारात हायवेलगत फुटली आहे. या पाईप लाईनमधून जेव्हा पाणी पुरवठा सिंधी कॉलनीच्या जलकुंभाला पुरवठा होतो. येथून मोठ्या प्रमाणावर पाणी निघून सरळ जारगांवातील नुराणीनगर परीसरातील नागरिकांनाच्या दुकानात आणि घरात पोहचत आहे. गल्लीतून हे पाणी पुन्हा हिरवा नदी पात्रात जात आहे.

यासंदर्भात येथील नागरिकांनी पाचोरा नगर परिषदेला तक्रार केली. मात्र पुन्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी याच ठिकाणी भलामोठा विस फुटाचा खड्डा करुन काम अर्धवट सोडून दिल्याने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. सदरची तक्रार कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे करताच त्यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुरवठा बंद झाल्यावर खड्डय़ातील घाणीचे पाणी सरळ पुन्हा पाईपलाईन मध्ये जाते आणि तेच पाणी पुढे नवीन पाणी पुरवठा सुरू केल्यावर सिंधी कॉलनीच्या जलकुंभात हे पाणी जात आहे. या पाईपलाईन फुटलेल्या जागेवर दोन विद्युत पुरवठाचे पोल आहेत ते कधीही खाली कोसळतील अशी परिस्थिती झाली आहे. पाचोरा नगर परिषदच्या संबंधित अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठाची फुटलेली पाईप लाईन जोडावी अन्यथा कॉंग्रेस आंदोलन करेल असे सचिन सोमवंशी यांनी म्हटले असून तसे निवेदन नगर पालिका प्रशासनाला देण्यात येणार आहे. एकीकडे शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी गेल्या दिड महीन्यापासून होत आहे. याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई मागणी कॉंग्रेसने केली आहे.

Protected Content