जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांचे आकर्षण असलेला मेहेरुणचा तलाव सध्या आटण्याच्या बेतात असून आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर तो पूर्णपणे आटून गुरांच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे.
मेहेरुणचा तलाव पूर्वीपासूनच जळगावकर नागरिकांचा जिव्हाळ्याचा आणि आकर्षणाचा विषय राहिला आहे. हा तलाव सहसा कधीच पूर्णपणे आटत नसतो. यापूर्वी क्वचितच तो संपूर्ण आटल्याची उदाहरणे आहेत. या तलावातून पूर्वी पाणी पुरवठाही केला जात होता, तरी तो कधी आटत नसे. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने हा तलाव आटत आला आहे. आता या तलावाचा शहराच्या पाणी पुरवठ्याशी काही संबंध नसला तरी, गुरांना पाणी म्हणून त्याचा वापर होत असतो. अशा परिस्थितीत हा तलाव आटल्यास गुरांची मोठी अडचण होणार आहे. तसेच उन्हाळ्यात थंडाव्यासाठी तलावाकाठी फिरायला जाणाऱ्या नागरिकांचाही हिरमोड होणार आहे.