बुलढाणा प्रतिनिधी । आसमानी संकटात सापडलेल्या शेतक-याला राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.खामगांव तालुक्यातील गारपिट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गावांचा दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते.
१७ मार्च रोजी खामगांवसह संपुर्ण जिल्हयाभरातील नांदुरा, शेगांव, जळगांव जामोद, मोताळा, मेहकर, चिखली, संग्रामपूर, बुलढाणा, मलकापूर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगांव राजा या सर्व तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. याबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव तालुक्यातील गारपिट, अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे नुकसान झालेल्या गावांचा दौरा केला.
आज खामगांव तालुक्यातील तांदुळवाडी, निपाणा, उमरा भंडारी, कुंबेफळ, भालेगांव, ढोरपगांव काळेगांव हया गावांच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला हयावेळी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी चव्हाण, तहसिलदार रसाळ, गोपाल गव्हाळ, पुंडलीक बोंबटकार, लाला महाले, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, युवराज मोरे, शांताराम बोधे, राजेश तेलंग, समाधान मुंडे हे सोबत होते. जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी मा.जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी फोनव्दारे चर्चा केली.
हयावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांची व्यथा मांडली, ते म्हणाले की, सर्वगांवामध्ये आसमानी संकटामुळे गहु, मका, हरबरा, कादा, टरबूज, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे. यासोबतच काही तालुक्यामध्ये केळी व इतर फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. या महिन्यात सतत तिस-यांदा अवकाळी पावसामुळे व वादळी वा-यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोंगून ठेवलेला हरबरा, गहू मातीत मिळाला आहे. रब्बीचे पिक मातीमोल झाले आहेत. हया सोबतच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे हया सर्व नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. हयाबाबत आपण तातडीने आदेश द्यावे असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी
ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. सुंपर्ण जिल्हयात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वारा व गारपिटीचे तात्काळ पंचनामे करुन व शेतक-यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी आज केली.