भुसावळ येथे व्यसनमुक्त जीवन संकल्पासाठी बैठकीचे आयोजन

bhusaval p

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आर्या फाऊँडेशन पोलीस विभाग, शहर पत्रकार संघटना, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व रिक्षा चालक मालक संघटना, राष्ट्रीय मजदूर युनियन, अश्विन सागर फाउँडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत हे व्यसनमुक्त जीवन जगण्याच्या संकल्पाने करुया. येत्या दि.31 डिसेंबर हा दिवस मद्याच्या धुंदीत न घालवता, “मद्याऐवजी दूध प्या, शरीर सुदृढ ठेवा”, ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि.21) रोजी सकाळी 12 वाजता बाजार पेठ पोलिस ठाणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत मदयप्राशन न करता दूधपिऊन किंवा नव-नविन संकल्प करून करूया आणि नवं वर्षाचे स्वागताला सर्वांनी व्यसनमुक्त समाज घडवण्‍याचा संकल्प करावा, असे आवाहन बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले. शहरातील आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन
या प्रसंगी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सपोनी सारिका खैरनार, आर्या फाऊॅडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे, पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष शेख सत्तार, उपसंपादक उज्वला बागुल, अश्विन सागर फाऊॅडेशनचे संचालक अरुण तायडे, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री नेवे यांच्या मार्गदर्शना खाली बैठक संपन्न झाली. प्रसंगी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सर्व रिक्षा चालक मालकांसह उपस्थितांना येत्या दि.31 डिसेंबर कसा साजरा करावा, या विषयावर मार्गदर्शन केले.

व्यसनमुळे होणारे दुष्परिणाम
तसेच नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र प्रमुख डॉ. वंदना वाघचौरे यांनी दारूचे दुष्परिणाम सांगितले. तर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष शेख सत्तार यांनी व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे, हे पटवून दिले. लोकशाहीच्या उपसंपादक उज्वला बागुल यांनी लहान मुले ही व्यसनाधीन होत आहेत ही गंभीर बाब असून समाजातील प्रत्येक घटकाने याकडे दुर्लक्ष करु नये, याकरीता असे उपक्रम व जनजागृती आवश्यक आहे.
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी संघटीत होऊन या उपक्रमास सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. सखी श्रावणीच्या राजेश्री नेवे यांनी मद्यामुळे परिवार कसा उध्वस्त होत आहे. त्याकडे सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

बैठकीत यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जी.आर.पी.रिक्षा स्टाफचे अध्यक्ष राजेंद्र देवमुठे सोबत साबीर शेखसादिक शे.हसन, एजाज खान, मेहबुब पेहलवान, माजीद खान, नासिर शेख जाफर, शरीफ गणी, सोबत काली पिली रिक्षा युनियनचे समाधान पाटील यांचेसह पत्रकार कलीम पायलट, गोपी म्यांद्रे, कमलेश चौधरी, इकबाल शेख यांच्यासह पत्रकार व विविध संघटनांपदाधिकारी व सद्स्य बैठकीस उपस्थिती होते.

जनजागृतीपर कार्यक्रम व आवाहन
जनजागृतीपर विशेष कार्यक्रमांचे आयोजन दि.28 रोजी रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ संध्याकाळी 4 वाजता जनजागृती व्हावी, याकरीता विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीच्या यशस्वीतेसाठी आर्या फाऊॅडेशनच्या मॅनेजमेंट टीमच्या सुवर्णा इंगळे, तसेच प्रशांत निकम, वैशाली सावळे, मालती येवले, पोलीस कर्मचारी नंदू सोनवणे, नाले आणि पत्रकार संघ यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content