मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहा जागांसाठी साठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून भाजपने तिसरी तर शिवसेनेने दुसरी जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यात मविआतील काही नेते फडणवीसांच्या भेटीला गेले. यावरून संजय राऊतांनी घोडेबाजारीचा आरोप केला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आणि भाजपकडे अतिरिक्त तसेच अपक्षांची मते आहेत. यात मविआ आणि भाजप या दोघांना एकमेकांची मते घेतल्याशिवाय सहावा उमेदवार निवडून येणे शक्य नाही. आणि राज्यसभा निवडणुकीच्या माघारीसाठीची मुदत दुपारी 3 पर्यंत असली तरी शिवसेना आणि भाजपपैकी कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने प्रत्यक्ष मतदान होऊन घोडेबाजार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

त्यातच राज्यसभेसह विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपची पडद्याआड चर्चा असून महाविकास आघाडीतील छगन भुजबळ, सुनील केदार आणि अन्य नेते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भेटीला गेले आहेत. अशावेळी शिवसेना प्रवक्ते तथा खा.संजय राउत यांनी भाजपचे नाव न घेता घोडेबाजारीचा आरोप केला आहे.
राज्यसभेसाठी आमदार खरेदी करण्यात येत असून प्रचंड घोडेबाजारीला उत आला आहे.मी काही दिवसापासून ऐकत आहे कि कोटी कोटी चे आकडे बाहेर येत असून आमदारांची घोडेबाजारी हे सर्वात मोठे मनीलॉड्रिंग असून यासाठी पैसा कुठून येतो, इडीने याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.



