


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांच्या आणि आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुक्ताईनगर तालुक्यातील समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक व ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी मुक्ताईनगर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात मराठा समाजातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. मराठा-कुणबी तसेच कुणबी-मराठा संदर्भातील उपलब्ध ऐतिहासिक महसुली व शासकीय नोंदींची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आणि पात्र व्यक्तींना नियमानुसार तात्काळ प्रमाणपत्रे वितरित करण्यात यावीत, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
शिक्षणातील प्रवेश आणि सरकारी नोकरीतील आरक्षणाचा प्रश्न कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या पद्धतीने तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. आरक्षणासंदर्भातील सर्व प्रलंबित मागण्यांवर शासनाने निव्वळ आश्वासने न देता लेखी स्वरूपात स्पष्ट निर्णय घेऊन कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आरक्षणाच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळवून देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच, राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व राजकीय व आंदोलनात्मक गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात यावेत, अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे. शासनाने आंदोलक प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक आणि निर्णायक चर्चा करून या ज्वलंत प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाची नोंद घेऊन शासनाने त्वरित योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत या निवेदनाची प्रत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.



