यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मालोद शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मका पीक, ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत किनगाव येथील शेतकरी सायबू नथू तडवी यांचे सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथील रहिवासी सायबू नथू तडवी यांच्या मालोद शिवारातील शेतात केळीची बाग असून त्या बागेमध्ये मका पिकाची लागवड करण्यात आली होती. मका पिकाचे कणसे तोडून त्यांचा ढिगारा करण्यात आला होता, तर उर्वरित कडबा बांधण्याचे काम बाकी होते. दरम्यान, १८ तारखेच्या सायंकाळी अचानक विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण परिसराला वेढले.

या आगीत केळीच्या बागेत अंथरण्यात आलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या पूर्णतः जळून खाक झाल्या. अंदाजे ७० हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे पाईप देखील जळाले. याशिवाय अंदाजे ६० हजार रुपये किमतीचा मका आणि कडबा आगीत भस्मसात झाला. शेतकऱ्याने मेहनतीने उभे केलेले पीक काही क्षणांत नष्ट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर मुबारक तडवी यांनी महसूल व कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर तलाठी मनीषा बारेला आणि कृषी सहाय्यक कैलास बारेला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानीचा पंचनामा केला. प्रशासनाकडून मदतीसाठी आवश्यक अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या ग्रामीण भागात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत विजेच्या तारा, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत उपकरणांमधील बिघाडामुळे शेतातील पिकांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच वीज वितरण कंपनीने देखील विद्युत यंत्रणांची वेळोवेळी तपासणी करून अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



