उद्या महाश्रमदान मोहिम : नागरिकांनी सहभागी व्हावे-पालकमंत्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कचरामुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत उद्या महाश्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

स्वच्छ भारत दिवसाच्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ’स्वच्छता ही सेवा’ ह्या थीमच्या अंतर्गत कचरामुक्त भारत उपक्रम आयोजन करण्यात आला आहे. पंधरवडयानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत  राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून  १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता  राज्यातील प्रत्येक गावात् ’’१ तारिख, १० वाजता, एक तास  महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे ५६७८६ उपक्रमांचे ग्रामीण भागात नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महाश्रमदानाकरिता सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

सदर पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत १९४६१ उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे ९५८४६८० नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाण, शासकीय इमारत, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, बसस्थानके, खुल्या जागा साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण, ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लॅस्टिक कचरा गोळा करणेबाबत मोहिम राबवावयाची आहे.

सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, महिला बचत गट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठया प्रमाणावर सक्रीय सहभाग नोंदवावा. असेही आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Protected Content