आई…मी पुन्हा ताठ मानेने परत येईल ! : संजय राऊत यांचे पत्र व्हायरल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणारे खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला लिहलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले असून यात त्यांनी अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी कारागृहात जाण्याआधी आपल्या आईला पत्र लिहले होते. हे पत्र आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. यात राऊत यांचा स्वामीमानी बाणा दिसून आला आहे. यात म्हटले आहे की, खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौर्‍यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौर्‍यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली. आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.

रविवारी (१ ऑगस्ट) ईडीचे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये’ म्हणालीस, खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज सामनात किंवा दौर्‍यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रु रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता,

आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहज कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोमहिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच घरी जात नाहीत. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही का? भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्भव ठाकरेंवर हल्ले करु लागला आहे. तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा असे सांगणारी तूच होतीस. हे लोक का फुटले? यांना काय कमी पहले होते? असा प्रश्नही तू हे सगळे पाहून विचारित होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची त्यासाठी लढावेच लागेल… प्रत्येक वेळी वीर शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्याच घरात का? हा प्रश्न असतोच.

शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मन्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ’ईडी’, ’इन्कम टॅक्स’ कारवाईच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेमानांच्या यादीत जायचे नाही, कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकर्‍यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधीचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल:

जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल, अशा धमक्या होत्या. या धमक्यांना मी भीक घातली नाही. या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून दूर आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच तोपर्यंत उद्धव आणि असंख्य शिवसैनिक तुझे मुले असतील, काळजी घे…!

Protected Content