जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जळगाव येथे वृक्ष आणि जल संवर्धनाच्या महत्त्वाचा संदेश देणाऱ्या एका विशेष पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
सध्या तीव्र उन्हाळा आणि बदलत्या हवामानामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक, कुटुंब, सामाजिक संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी जल आणि वृक्ष संवर्धन करणे ही काळाची नितांत गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, वसुंधरा आनंदी असेल तरच सजीव सृष्टी सुखी राहील. त्यामुळे आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया आणि आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ प्रत्येकाने किमान एक वृक्ष नक्की जगवूया. त्या वृक्षाला आपले नाव देऊया आणि हे मंगल कार्य प्रत्यक्षात आणूया, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.