ग्रामीण गृहनिर्माण योजनेत जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी, १३४ टक्के घरकुले पूर्ण!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेत जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या १३४ टक्के, म्हणजेच ८ हजार ३६२ ऐवजी ११ हजार २४४ घरकुले पूर्ण करून जळगाव जिल्हा अव्वल ठरला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामीण गृहनिर्माण योजनेचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना अभिनंदनपर पत्र पाठवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर २०२४ रोजी १०० दिवसांच्या कार्यक्रमांची घोषणा केली होती. यात ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी काही उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली होती. यामध्ये किमान १३ लाख घरकुलांना मंजुरी देणे, किमान ३ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करणे, किमान १ लाख घरकुले प्रत्यक्ष पूर्ण करणे, किमान ५ हजार लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी महाआवास अभियान राबवणे या प्रमुख उद्दिष्टांचा समावेश होता.

जळगाव जिल्ह्याने या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ग्रामीण गृहनिर्माण योजनेत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्याला ८ हजार ३६२ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, परंतु जिल्हा प्रशासनाने ११ हजार २४४ घरकुले पूर्ण करून १३४ टक्के यश मिळवले आहे. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ग्रामीण गृहनिर्माण संचालकांनी श्रीमती मिनल करनवाल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने केलेल्या समर्पित प्रयत्नांमुळे असंख्य कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे आणि अनेक कुटुंबांचे जीवन अधिक सुरक्षित व स्थिर झाले आहे, असे गौरवोद्गार संचालकांनी काढले आहेत.

जळगाव जिल्ह्याच्या या यशस्वी कामगिरीमुळे इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीत जळगाव जिल्हा एक आदर्श ठरला आहे.

Protected Content