
मुंबई-वृत्तसेवा । आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुतीचे नेते तथा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर पक्षाविरोधात उमेदवारी दाखल करणाऱ्या बंडखोरांना शांत करण्यासाठी भविष्यातील महामंडळे आणि शासकीय समित्यांमधील पदांची संधी देण्याचे संकेतही त्यांनी दिले.

राज्यात १८ जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर अनेक ठिकाणी महायुतीसमोर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी महायुतीची अधिकृत भूमिका स्पष्ट करत सर्व घटक पक्षांमध्ये उत्कृष्ट समन्वय असल्याचे सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि कार्यकर्त्यांची ताकद लक्षात घेता महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आतापर्यंत तीन महत्त्वाच्या ठिकाणची बंडखोरी यशस्वीपणे शमवण्यात आल्याचा दावा चव्हाण यांनी केला. उर्वरित नाराज नेत्यांशीही चर्चा सुरू असून पक्षहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
४ जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महायुतीने बंडखोरांना विशेष संदेश दिला आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांनी वरिष्ठांशी चर्चा करून आपले अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जे नेते आणि कार्यकर्ते पक्षाचा आदेश मान्य करून माघार घेतील, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा सकारात्मक विचार केला जाईल. भविष्यात विविध महामंडळे, मंडळे तसेच शासकीय समित्यांमधील अध्यक्ष किंवा सदस्यपदांसाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते, असे संकेत रवींद्र चव्हाण यांनी दिले.
महायुतीने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांच्या यादीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखाणी, भंडारा-गोंदिया येथून अविनाश ब्राह्मंडकर, अमरावतीतून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-बीड-लातूरमधून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन, नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार, ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दृष्यंत चतुर्वेदी, परभणी-हिंगोलीमधून सय्यद खान, नाशिकमधून नरेंद्र दराडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे आणि पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या आव्हानावरही महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले. विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचा दावा करत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुसंख्य माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे राज्यातील सर्व राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.



