डाव्या संघटना बिघडवताहेत शिक्षण क्षेत्रातील वातावरण : २०८ तज्ञांचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | डाव्या विचारधारेशी जुळलेल्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील वातावरण बिघडवले आहे, असा आरोप शैक्षणिक क्षेत्रातील २००हून अधिक तज्ज्ञमंडळी आणि प्रतिष्ठित विद्यापीठांच्या कुलगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या एका पत्राद्वारे केला आहे. देशातील शैक्षणिक वातावरण दूषित केले जात आहे, असे जेएनयू, जामिया, एएमयू आणि जाधवपूर विद्यापीठातील अलीकडच्या घटनांमधून दिसून येते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

देशभरातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांतील कुलगुरू आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ अशा एकूण जवळपास २०८ जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. डाव्या विचारधारेशी संबंधित संघटना आणि कार्यकर्त्यांनी देशातील शैक्षणिक वातावरण बिघडवले आहे, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. डाव्या संघटनांमधील काही कार्यकर्ते देशातील शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यात म्हटले आहे. ‘विद्यार्थी राजकारणाच्या नावाखाली डावे अजेंडा राबवत आहेत, असे आम्हाला वाटते. अलीकडेच जेएनयूपासून ते जामिया आणि एएमयूपासून जाधवपूर विद्यापीठातील घडलेल्या घटनांमधून दिसते की, कशाप्रकारे शैक्षणिक वातावरण खराब केले जात आहे. यामागे डाव्या संघटनांमधील कार्यकर्ते आहेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये हरिसिंह गौर विद्यापीठाचे कुलगुरू आर.पी. तिवारी, साऊथ बिहार सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू एचसीएस राठोड, सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू शिरीष कुलकर्णी यांचा समावेश आहे. ‘शैक्षणिक संस्थानांमध्ये डाव्या संघटनांच्या आराजकतेविरोधात निवेदन’ या शिर्षकाखाली हे पत्र लिहिले आहे. त्यावर २०८ शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content