कापूस पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना आवाहन

lashkari ali

जळगाव, प्रतिनिधी । कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा (फॉल आर्मीवर्म) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीची शिफारस केली असून एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी शेतामध्ये नियमितपणे निरीक्षण आणि देखरेख करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा. कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरीत वेचून अळ्यासहित नष्ट करावीत जेणेकरून, अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. किडीचे वेळेवर व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकाच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजीवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुलिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भावीत पिकांचे अवशेष तातडीने नष्ट करावेत. प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. मुख्य शेत तणविरहीत ठेवणे. तसेच आजुबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे. किटकनाशक नोंदणी समितीने मंजूर केलेल्या शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत किटकनाशकांचा वापर करावा. कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती

http://ppqs.gov.in/sites/default/files/cotton.pdf

या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रमाणे उपाय योजना कराव्यात.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे कापूस पिकावर मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि किंवा नोमेरिया रिलाई या कीडरोगजनक बुरशींची ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे प्रादुर्भावीत कापूस पिकाचे पुढील नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यावर स्पिनेटोरम 11.7 टक्के एस.सी. ०.८ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एस.सी. ०.३ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ०.४ ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९ टक्के ईसी १.१६ मिली या किटकनाशकांची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) याकिडीचे मका हे मुख्य खाद्य असले तरीही ते पीक शेतातून काढून टाकल्यास किंवा ते पीक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यास त्याची पसंती कमी होऊन या किडीचा कपाशी, बाजरी व इतर पर्यायी पिकांवर प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. ही कीड सुमारे 80 पिकांवर उपजीविका करत असल्याने खरीपातील मका पीक काढल्यानंतर ती आजुबाजूच्या इतर पिकांवर स्थलांतरीत होऊ शकते,
राज्यात रब्बीमध्ये सरासरी 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी केली जाते. यावर्षी झालेले पर्जन्यमान विचारात घेता मका तेच इतर रब्बी पिकाखलील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी सतर्क राहून या किडीच्या वेळीच व्यवस्थापनासाठी वरील पध्दतीचा वापर करावा. असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

Protected Content