केटामाईन साठा प्रकरणात सात जण दोषी; पाच निर्दोष

court

जळगाव प्रतिनिधी । डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर 2013 मध्ये जळगावच्या रेणुका इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून सुमारे ११८ कोटी रुपये किंमतीचे केटामाइन या अंमलीपदार्थाचा साठा जप्त आला होता. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 12 संशयित आरोपींपैकी सात आरोपींना जळगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरविले तर पाच जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

काय आहे हे प्रकरण
याबाबत माहिती अशी की, अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या केटामाइनचा सुमारे 1.2 टनचा साठा केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जळगावात शुक्रवारी 13 डिसेंबर 2013 रोजी मध्यरात्री पकडला होता. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये आहे. उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 1175 किलो केटामाइन जप्त केले. रूखमा इंडस्ट्रीजचे नितीन चिंचोले आणि मुंबईस्थित विकास पुरी हे अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सुरूवातीला पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली होती. मास्टरमाइंड विकास पुरी हा मुख्य सुत्रधार होता. विकास पुरीने औषधशास्त्र विषयात एम.टेक. केले असून या क्षेत्रातला तो तज्ज्ञ मानला जात होता. त्याच्या व्हीसी फार्मा आणि स्पेशालिटी केमिकल या दोन कंपन्या रत्नागिरी येथे आहेत.

या 12 संशयितांवर होता गुन्हा
वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल दोन्ही रा. विकरोली मुंबई, नित्यानंद थेवर (वय 27) रा. धारावी मुंबई, कांतीलाल उत्तम सोनवणे रा. जळगाव, श्रीनिवास राव, विकास पुरी रा. पवई मुंबई, खेमा मधुकर झोपे रा. अंबरनाथ ठाणे, विकास रामकृष्ण चिंचोले रा. जळगाव, नितीन चिंचोले रा. आदर्श नगर, रजनिश ठाकूर सिकंदराबाद, एस.एम.संथिककुमार मैलापूर, चेन्नई आणि विशाल सोमनाथ पुरी रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात आत्तापर्यंत 44 साक्षिदार डीआरआयतर्फे तपासण्यात आले व आरोपी विकास पुरीतर्फे सहा साक्षीदार बचावार्थ तपासण्यात आले. याप्रकरणात आत्तापर्यंत न्यायालयात जवळपास 550 विविध कागदपत्रांची पुर्तता करून चौकशी तपासणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्या. ठुबे यांनी 12 संशयितांपैकी वरूणकुमार तिवारी, श्रीनिवास राव, विकास पुरी, खेमा मधुकर झोपे, नितीन चिंचोले, रजनिश ठाकूर, एस.एम.शिंथीलकुमार या 7 जणांना दोषी ठरविले असून उर्वरित 5 जणांना निर्दोष मुक्तता केली आहे. पुढील अंतीम सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. डीआरआयतर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अतुल जाधव आणि ॲड.खुशाल परमार, मुंबई यांनी कामकाज पाहिले तर आरोपीतर्फे ॲड. अकिल इस्माईल, ॲड. हिम्मत सुर्यवंशी, ॲङ प्रविण पांडे, ॲड.उपासणी, ॲड. एस.के. कौल व ॲड. दर्जी यांनी कामकाज पाहिले.

Add Comment

Protected Content