ट्रकने रिक्षाला उडविले : दोन जागीच ठार; चार गंभीर

जामनेर, भानुदास चव्हाण | लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणार्‍या पॅजो रिक्षाला समोरून दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान आज सकाळी घडला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, लाकडाने भरलेला आयशर ट्रक (क्रमांक एचएच १९- ६०४३ ) हा जामनेरकडून भुसावळकड भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा या गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले असून दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रूग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जखमींना जामनेर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षा अक्षरश: चक्काचूर झाली असून ट्रक देखील रस्त्यावर उलटला असून याचा चालक आणि क्लिनरला देखील दुखापत झाली आहे. तर या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. पोलिसांनी अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली आहे.

Protected Content