वाघूर धरण पूर्ण भरले; जळगावकरांची मिटली चिंता

जळगाव प्रतिनिधी | शहराला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण पूर्णपणे भरले असून आज यातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे जळगावकरांची आगामी वर्षासाठीची चिंता मिटली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिशय जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यानंतर काल धरण हे पूर्णपणे भरले असल्याने आता जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या आठवड्यातच महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत वाघूर धरणाचे जलपूजन करण्यात आले होते. आता धरण पूर्ण भरल्याने एक दिवसाआड पाण्याचे नियोजन शक्य होणार आहे.

दरम्यान, वाघूर धरणातून आधी देखील चार गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मध्यंतरी गेट बंद करण्यात आले असले तरी आता धरण पूर्ण भरल्यामुळे यातून पाण्याची विसर्ग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content