वसुली हाच महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा ! : आ. गिरीश महाजन

जामनेर प्रतिनिधी | राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी झालेले आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून वसुली हाच महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा असल्याची टीका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली. ते भाजपच्या तालुका बैठकीत बोलत होते.

माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची तालुका बैठक शुक्रवारी पार पडली. या वेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, सरचिटणीस सचिन पानपाटील, नवलसिंग पाटील, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल, शिवाजी सोनार, छगन झाल्टे, दिलीप खोडपे, तुकाराम निकम, बाबुराव घोंगळे, राजधर पांढरे, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे, संजय देशमुख, जलाल तडवी, संजू पाटील, नाना सोनार, अतिष झाल्टे, नीलेश चव्हाण, बाळू चव्हाण, रमेश नाईक आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपची ध्येयधोरणे आणि केंद्र सरकारची कामगिरी याबद्दलची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर, आ. गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, निल देशमुख १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये असून वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे, असे सांगत त्यांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, असे स्पष्ट केले. या सरकारला सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांचे काही एक देणे घेणे नसून केवळ वसुली हाच एकमेव अजेंडा महाविकास आघाडी सरकारचा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये पोलिस-चोर असा खेळ सुरू असल्याची टीका देखील आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी केली.

प्रास्ताविक चंद्रकांत बाविस्कर यांनी तर रवींद्र झाल्टे यांनी आभार मानले. बैठकीला पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकांबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Protected Content