जर तुम्ही निर्दोष असाल तर घाबरता कशाला ? : गुलाबभाऊंचा खडसेंना प्रश्‍न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोसरी जमीन प्रकरणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर टीका करत त्यांना खोचक सवाल विचारला आहे.

बहुचर्चीत भोसरी भूखंड प्रकरणात पुन्हा चौकशी केली जात असून यात आमदार एकनाथराव खडसे हे अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी सरकारकडून छळ केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, भोसरी भूखंड प्रकरण फार जुने प्रकरण आहेत. यात खडसेंचे जावई देखील जेलमध्ये आहेत. आता हे प्रकरण सरकारने बाहेर काढले नाही तर तपास यंत्रणांनी ते बाहेर काढले आहे. त्यांना पुन्हा यात तपास करायचा असल्याने ते चौकशी करत आहेत. एकनाथ खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे. ते जर यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

भोसरी येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती आणि जावई हे अडचणीत आहेत. यात त्यांचे जावई हे गेल्या सुमारे सव्वा वर्षापासून कारागृहात आहेत. तर खडसे आणि त्यांच्या पत्नी यांना जामीन मिळालेला आहे. मध्यंतरी हे प्रकरण थंड बस्त्यात गेल्याचे मानले जात असतांना आता विद्यमान सरकारने याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिल्याने आता यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

 

 

Protected Content