अतिवृष्टीचा तीन तालुक्यांना फटका; प्रशासनाने जाहीर केली आकडेवारी

जळगाव प्रतिनिधी | कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावमधील एकूण ३८ गावे बाधीत झाली असून यात दोन जणांच्या मृत्यूसह मोठी हानी झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

काल सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. आज रात्री निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीतूनही हीच बाब अधोरेखीत झाली आहे.

या अहवालात म्हटले आहे की, मंगळवार दि.३१/०८/२०२१ रोजी पहाटे सुमारे २.०० ते ३.०० वाजे दरम्यान अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळली असुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी एसडीआरएफचे धुळे येथील पथक कार्यरत आहे. कालपासून चाळीसगाव तालुक्यातील तितूर व डोंगरी नदीला पूर आलेला आहे. रात्री झालेल्यापावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील खालील नमुद गावे आणि चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे ५० ते ६० घरांत पाणी शिरले आहे. कन्नड घाटात मोठया प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे अनेक वाहने रात्रीपासून अडकून पडली आहेत. या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफचे पथक पोहचले असुन, घाटातील दरड हटविण्याचे व अडकलेली वाहने काढण्याचे काम सुरु आहे. तसेच चाळीसगांव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था ए.बी. हायस्कूल व उर्दू हायस्कुल चाळीसगांव मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे जेवणाची व्यवस्था चाळीसगांव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ४२, पाचोर्‍यातील ४ तर भडगावमधील २ असे एकूण ३८ गावे बाधीत झाली आहेत. यात दोन जणांचा बळी गेलेला आहे. अतिवृष्टीमुळे १५५ लहान तर ५०६ मोठी गुरे वाहून गेली आहेत. जोरदार पावसामुळे ३८ घरे पूर्ण तर ६३७ घरे अंशत: वाहून गेली आहेत. तर पाण्यामुळे ३०० दुकानांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या अहवालात वर्तविण्यात आलेला आहे. तर अतिवृष्टीमुळे १५१९५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या आठवडाभरात नुकसानीची पूर्ण माहिती घेतली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी या अहवालात म्हटले आहे.

Protected Content