नियमांच्या पालनावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांने पालन होते की नाही ? यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चेहर्‍यावर मास्क न लावणे, गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्सिंग व इतर तरतुदींचा भंग करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश दिले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी हे ग्रामीण भागासाठी जि.प. गटनिहाय व नगरपालिका वॉर्ड, प्रभागनिहाय एक अधिकारी व दोन कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र पथकाची स्थापना करणार आहेत. संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून एक पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देेणार आहे. ही पथके सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या, प्रवास करताना मास्क न वापरता आढळणार्‍यांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहेत. दुचाकीवर दोन, तीन चाकीमध्ये चालकासह २ प्रवासी व चारचाकीमध्ये अत्यावश्यकसाठी चालकासह ३ प्रवासी या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास वाहनास ५०० रुपये दंड करणार आहे. वाहनांवरील कारवाईचा अहवाल आरटीओंकडून जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात येणार आहे.

यासोबत कोणत्याही दुकानात एकाचवेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत. विनामास्क येणार्‍या कोणत्याही ग्राहकास दुकानदाराने माल, सुविधांचा पुरवठा करू नये. सर्व दुकाने मालक व कर्मचार्‍यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच तात्काळ दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. एका ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता अनावश्यकरिता ५ पेक्षा जास्त गर्दी करून जमा झालेल्या नागरिकांना प्रतीव्यक्ती २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई करताना संबंधितांचे फोटो काढण्यात येणार आहेत.

Jalgaon collector, jalgaon news, jalgaon corona updates, corona updates, jalgaon, jalgaon breaking news, marathi news

Protected Content