बीएचआर : विधानपरिषद निवडणुकीतील आर्थिक व्यवहार देखील रडारवर

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर गैरव्यवहारात आज करण्यात आलेल्या अटकेनंतर २०१६च्या अखेरीस झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतील आर्थिक व्यवहार देखील रडारवर आले असून पोलीस पथक या दिशेने चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, बीएचआर पतपेढीच्या गैरव्यवहारात २०१६च्या अखेरीस झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतील आर्थिक व्यवहाराची किनार देखील कारणीभूत असल्याची आधी दबक्या आवाजात चर्चा होती. यातील कागदोपत्री पुरावे देखील असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज जळगावात दाखल झालेल्या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विधानपरिषदेच्या निवडणुकीशी संबंधीत व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार हे कायद्याच्या कचाट्यात आढळून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content