रावेर, प्रतिनिधी | शहरात रामनवमीनिमित्त उसळलेल्या दंगलीत एकाचा खून केल्याचा आरोप असलेल्या १५ जणांची भुसावळ येथील सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आज (दि.१३) निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ एप्रिल २००८ रोजी शहरातून रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक शहरातील कोतवाल वाड्यातील मशिदीजवळुन जात असतांना हिंदू-मुस्लिम दंगल उसळली होती. यात यूनुस खा इब्राहीन खा हा घरी जात असतांना त्याच्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हल्ला करून त्याला जीवे ठार मारले होते. या घटनेचा आरोप शहरातील १५ जणांवर ठेवून त्यांच्याविरुध्द कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही केस तब्बल ११ वर्षे चालली, न्यायालयामध्ये सर्व साक्षी-पुरावे तपासल्यानंतर अखेर आज केसचा निकाल देण्यात आला. सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी शंतनू डहाळे, अविनाश हरणे, संतोष महाजन, मुक्तानंद दानी, दिनेश सोनवणे, किशोर मानकर, अतुल महाजन, प्रमोद महाजन, किशोर महाजन, चंद्रकांत माळी, रविंद्र महाजन, सुनिल शिंदे, सुरेश शिंदे, योगेश परदेशी, विनोद तायडे, या सर्व १५ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींतर्फ़े अॅड.व्ही. आर. ढाके, अॅड.एल.के. शिंदे, अॅड.के.डी. ठाकुर, अॅड. तुषार माळी यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅड. सोनवणे यांनी काम पाहिले.