नवी दिल्ली वृत्तसंस्था । वेस्ट इंडिजविरुद्ध येत्या ६ डिसेंबरपासून होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली.
शिखर धवन हा सध्या गुडघ्याच्या दुखापतीने हैराण आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात झेल पकडताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला तब्बल २० टाके घालावे लागले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मंगळवारी त्याची फिटनेस टेस्ट केली. धवन पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्याला टी-२० मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. संजू सॅमसनला बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतही संधी देण्यात आली होती. मात्र, अंतिम संघात त्याला स्थान मिळू शकले नव्हते. तीन सामन्यांची ही मालिका भारताने २-१ ने जिंकली होती.
टी-२० मालिकेसाठी संघ:-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन