नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताने पाकच्या हद्दीत शिरून हवाई हल्ला केल्याचा आरोप आज पाकने केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
भारत व पाकमधील तणाव कुणापासून लपून राहिलेला नाही. गत अनेक दिवसांपासून दोन्ही देश सिमारेषेवर तयारी करत असल्याची माहिती आधीच समोर आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी पाक सैन्याने भारतावर हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मुजफ्फराबाद परिसरातून भारतीय विमाने पाकमध्ये घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताने पाकव्याप्त काश्मिरमधील बालाघाट येथे पहाटे साडेतीन वाजता लढाऊ विमानातून काही तरी टाकल्याचे पाकचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर पाक हवाई दलाने प्रत्युत्तराची तयारी केल्यानंतर भारताचे विमान माघारी फिरल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. मात्र भारताने याबाबत अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.