न्यूझीलंडला कडवी झुंज देवूनही भारत विश्वचषकातून बाहेर

India New Zealand 1

मँचेस्टर, वृत्तसंस्था | वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टरवर येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव झाला. या पराभवासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

 

भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली असताना अखेरच्या षटकापर्यंत रंगत आणणाऱ्या धोनी आणि जडेजाची झुंज अखेर अपयशी ठरली. न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची पहिल्या १० षटकांमध्येच ४ बाद २४ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत परतले होते. तसेच दिनेश कार्तिक सहा धावांवर माघारी परतला. पुढे ऋषभ पंत (३२) आणि हार्दिक पंड्या (३२) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. सँटनरच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंत झेलबाद झाला. त्यानंतर धोनीने संघाची धुरा सांभाळत मैदानात जम बसवला तर जाडेजाने फटकेबाजी करत सामन्यात भारताला पुनरागमन करून दिले. जडेजाने ५९ चेंडूत ७७ धावांची खेळी साकारली. धोनी आणि जाडेजाने सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. मात्र, संघाला विजय प्राप्त करून देण्यात दोघांना अपयश आले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने १० षटकांमध्ये ३६ धावा देत तीन बळी मिळवले. यात लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या विकेटचा समावेश आहे. त्यामुळे हेन्री सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.

Protected Content