आणीबाणीतील योद्ध्यांचा गौरव, माहितीपर प्रदर्शनीचे उद्घाटन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजप युवा मोर्चातर्फे जळगावात ‘मॉक पार्लमेंट’ (नमुना संसद), विशेष माहितीपर प्रदर्शनी आणि आणीबाणीतील ‘सत्याग्रहीं’च्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण पिढीला आणीबाणीच्या काळातील घटनात्मक व्यत्ययाची आणि काँग्रेस सरकारच्या हुकूमशाही निर्णयांची माहिती देऊन त्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.

१९७५ ते १९७७ या दोन वर्षांच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने संविधानात्मक अधिकार निलंबित करून लोकशाही व्यवस्थेला मोठा धक्का दिला होता. या काळात अनेक निष्पाप नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि विचारवंतांना कारावास भोगावा लागला होता. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या मॉक पार्लमेंटमधून युवकांना त्या काळाची जाणीव व्हावी, लोकशाही मूल्यांची जपणूक करता यावी आणि राष्ट्रहिताचे भान निर्माण व्हावे, हा उद्देश आयोजकांनी स्पष्ट केला.

मॉक पार्लमेंटमधील चर्चेचे प्रमुख मुद्दे संविधान व मूलभूत अधिकारांचे उल्लंघन, जनसंघ, RSS व ABVP यांची भूमिका, तसेच २५ जून ‘राष्ट्र प्रतिकार दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प हे होते. युवकांनी प्रत्यक्ष संसद कार्यप्रणालीसारखी मांडणी करत तत्कालीन परिस्थितीवर अभ्यासपूर्ण चर्चा केली.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे “आपत्कालीन काळातील घटना व संघर्ष” या विषयावर आधारित माहितीपर प्रदर्शनी होती, जिचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते झाले. तसेच, आणीबाणी काळात अन्यायकारक शिक्षा भोगलेल्या श्री. विश्वासराव कुलकर्णी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी आमदार श्री. राजू मामा भोळे, भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे, प्रदेश उपाध्यक्ष अमित सोलंकी यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मॉक पार्लमेंटमध्ये न्यायाधीश म्हणून श्री. विश्वासराव कुलकर्णी आणि दीपमाला काळे यांनी न्यायपूर्ण पद्धतीने भूमिका पार पाडली.

स्पर्धात्मक सत्रात गौरव पाटील याने प्रथम पारितोषिक पटकावले, तर नचल लालवाणी, अनिरुद्ध ठाकूर आणि विशाल पवार यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पुरस्कार हर्षा ओसानी व दीपक पाटील यांना देण्यात आले. विजेत्यांचा सत्कार भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीमधील अश्विन सैंदाणे, अक्षय जेजुरकर, स्वप्निल चौधरी, गजानन वंजारी, हर्षल सीतपाल, उन्मेष चौधरी, विकी चौधरी, गौरव पाटील, रोहित सोनवणे, विशाल सोनार आणि भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.