जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टी, जोरदार वारे, विजांचा कडकडाट तसेच काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, बचाव साहित्य व मनुष्यबळ सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले असून, पूरप्रवण क्षेत्रे, धरणे, नाले आणि नदीकाठांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वीज, पाणी, आरोग्य, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी, नाले, पूल, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळावे. हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1077, जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे 0257-2217193 / 0257-2223180 या क्रमांकांवर किंवा व्हॉट्सअॅप हेल्पलाईन 9373789064 वर संपर्क साधावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे.



