लक्ष्मण रेषा ओलांडली तर चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली, वृत्तसेवा । भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीबाबत कठोर भूमिका घेत पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनाती केली जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही फॉरवर्ड पोझिशन्सवरील आपली स्थिती आणखी बळकट केली आहे.

चुशूल सेक्टरमध्ये मुखपरी टॉपजवळ सोमवारी ४५ वर्षात पहिल्यांदाच गोळीबार झाला. त्यानंतर भारताकडून हा इशारा देण्यात आला. आज गुरुवारी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीवरही बरेच काही अवलंबून आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. जो प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला व भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या टेकडया ताब्यात घेतल्या. तेव्हापासून चीनची दादागिरी आणि आक्रमकता वाढली आहे.

Protected Content