धरणगाव, प्रतिनिधी | मी केवळ धरणगावच्या विकासाचा शुध्द हेतू ठेवून ही निवडणूक लढवीत आहे, त्यामुळे मी विरोधकांची टीकाही आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. जर जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला पद देवून सेवेची संधी दिली तर माझ्या कामातूनच मी टीका करणाऱ्यांना उत्तर देईन, असे विनम्र मत आज शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी त्यांच्या विरोधात शहरात वाटण्यात आलेल्या पत्रकांबद्दल बोलताना आज (दि.२८) येथे मांडले. ते येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
आज शहरात निलेश चौधरी यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी आणि त्यांची बदनामी करणारी पत्रके विरोधकांकडून वाटण्यात आली. त्याबाबत कार्यकर्त्यांनी त्यांना, आपण आता काय करायचे ? कसे प्रत्युत्तर द्यायचे ? असा सवाल केला असता निलेश चौधरी यांनी अत्यंत संयमाने कार्यकर्त्यांना सांगितले की, आरोप-प्रत्त्यारोपांच्या वादातून काहीच साध्य होत नाही. मला कुणाशीही वाद करण्याची इच्छा नाही. मी जनसेवेसाठी राजकारणात आलोय. त्यामुळे संधी मिळाली तर मी जनसेवेच्या माध्यमातूनच माझ्या विरोधकांना चोख उत्तर देईन. त्यामुळे तुम्ही सर्वांनीही संयम ठेवून निवडणुकीच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.