मी सातारा लोकसभेचा राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या’: खा. उदयनराजे

udayanraje bhosale

 

सातारा (वृत्तसंस्था) ‘ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या; मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’,असे खळबळजनक आव्हान विधान खासदार उदयनराजे भोसलेंनी फेसबुकच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, पराभूत उमेदवारांनी अनेकदा ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उचलला आहे. पण विजयी उमेदवाराने ईव्हीएमवर आक्षेप घ्यायची ही पहिलीच वेळ आहे.

 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे भोसलेंनी म्हटले आहे की, प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. १००० बॅलेट पेपरचा खर्च १,३०० रुपये तर एका ईव्हीएमचा खर्च ३३००० रुपये आहे. भारतात सामान्यांनी दिलेल्या कराच्या पैशाचा अपव्यय होतो आहे, असा आरोपही उदयनराजेंनी केला आहे. कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत. असे असताना त्या विषयातील तज्ज्ञ नसतानाही न्यायालये इव्हीएमबाबत आग्रही राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?’ असा सवालही उदयनराजेंनी केला आहे. तर एकूण मतदान आणि मतमोजणीतील तफावतीवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.

‘ माझ्याच लोकसभा मतदार संघात वाई मतदारसंघात ३४४, कोरेगावमध्ये पाच, कऱ्हाड उत्तरमध्ये १४८, कऱ्हाड दक्षिणमध्ये पाच, पाटणमध्ये ९७, तर सातारा मतदार संघात ७५ मतांचा फरक आला आहे. अशाच प्रकारे देशातील ३७६ मतदार संघात झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आहे’ असा आरोप त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या साइटवरील माहितीत तफावत आढळल्यावर ती माहितीच निवडणूक आयोगाने काढून टाकली आणि व्हायरसमुळे माहिती काढण्यात आली, असे स्पष्टीकरण आयोगाने दिल्याचे उदयनराजेंनी सांगितले आहे. ‘वायरसमुळे माहिती गेली असे आयोग म्हणतो. मग, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? असा सवालही त्यांनी केला आहे.

Protected Content