जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात एका भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भारतीय संविधान दिले, जे आज आपल्या सर्वांच्या जगण्याचे मुख्य माध्यम बनले आहे. संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्याची महती केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक मोठ्या राष्ट्रांमध्ये आजही दिसून येते आणि त्यांच्या स्मृती जगभरात जतन केल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी गोदावरी फाउंडेशनच्या वतीने महामानवास कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, रजिस्टर प्रमोद भिरूड, संगणक विभागाचे भूषण चौधरी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडला.



