यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सीम गायरान रस्त्यावर असलेल्या निंबादेवी धरणाजवळ आज (३ जुलै) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. निंबादेवी धरण पाहून आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अकलूज येथील विजय शिवा भिल (वय १७), कृष्णा गजानन पवार (रा. अकलूज) आणि मयूर सुधाकर सोनवणे (वय २१, रा. वाघळूद, ता. यावल) हे तिघे मित्र एकाच मोटरसायकलवरून (शाहीन) निंबादेवी धरण पाहण्यासाठी गेले होते. धरण पाहून ते यावल तालुक्यातील अकलूज येथे परतत असताना, सावखेडा सीम गायरान रस्त्यावरील एका वळणावर त्यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले.
या भीषण अपघाताची तीव्रता इतकी होती की, मोटारसायकलचे दोन तुकडे झाले. यामध्ये विजय शिवा भिल याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयूर सुधाकर सोनवणे आणि कृष्णा गजानन पवार यांना डॉ. तुषार सोनवणे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवले आहे.
याच निंबादेवी धरण परिसरात एकाच आठवड्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.