हिवरीदिगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Hivarkheda enws

पहूर, ता.जामनेर (रविंद्र लाठे)। जामनेर तालुक्यातील हिवरीदिगर येथील येण्या-जाण्यासाठी वाघूर नदीत फरशी पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी सामुहिक निर्णय घेऊन विधानसभा मतदानावर सोमवारी बहिष्कार टाकला. त्यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतू गावकरी मंडळी मतदान न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.

पहूर येथून जवळच 5 कि.मी अंतरावर हिवरीदिगर गाव असून गावाच्या मधून वाघूर नदीचा प्रवाह असुन गावाच्या पश्चिमेस केवडेश्वर नाला आहे. याची फरशी छोटी असून नदीला पूर आल्यास पाणी आल्यावर हिवरी गावाचा हिवरखेडा दिगर व पहूर या गावांशी संपर्क तुटतो. गेल्या 10 वर्षांत झाला नाही. येवढा पाऊस यावर्षी होत असल्याने वाघूर नदीला यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात पुराचे पाणी सुरूच आहे. तर जगप्रसिद्ध अजिंठा लेणींच्या कुशीतुन वाघूर नदीचा उगम असल्याने व सततच्या पावसाने वाघूर नदीचे पाणी पातळीत अचानक वाढ होत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी शारदा दिपक पांढरे, सोहम दिपक पांढरे, सार्थक पांढरे, रोहित पाटील सम्राट मोरे,विनोद मोरे हे वाघूर पात्रातून जिवघेणा प्रवास करीत असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेने यांचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे.

नदीला पाणी असल्याने येथील शाळकरी मुले चारमहिन्यांपासून शाळेत गेले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. वर्षेभरापासून कोण गामसेवक आहे. हे आमाहाला माहित नसून याची कल्पनाही नाही , तर भर पाऊसाळ्यात गेल्या महिनाभरापासून पाणी मिळत नाही. गेल्या पंचवीस वर्षांपुर्वी पासुन वाघूरच्या नदीपात्रात फरशी पुलाचीमागणी असून ती पुर्ण न झाल्याने गावकऱ्यांची नाराजी आहे, लोकप्रतिनिधींविषयी आमचा संताप आहे. आम्हाला फक्त आश्वासने दिली जात आहे. अशा स्वरूपात संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

फरशीला मंजुरी
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने वाघूर नदीच्या पात्रात फरशी पुलाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 4 कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात या फरशी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी दिली आहे.

प्रशासनाने केली गावकर्यांची समजूत
मंडळाधिकारी एस.एस.पवार, तलाठी सुरज बिकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढून मतदान करण्यासाठी विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी हि विनंती झूगारून आमचा रोष लोकप्रतिनिधींवर असून प्रशासनावर नाही, असे सांगितले. तर जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली पण निष्फळ ठरली आहे.

हिवरखेड्यात मतदान केंद्र
हिवरीदिगर येथे 350 मतदार असून होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत येथील ग्रामस्थ वाघूर नदी ओलांडून हिवरखेडा दिगर येथे मतदान केंद्रावर मतदान करीत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने वाघूरच्या पाणी पातळीत आचनक वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी हिवरखेडा दिगर येथे मतदानासाठी 10 किलोमीटर फेऱ्याने पहूर मार्गे वाहनाने जावे लागणार असल्याने नागरिक संतप्त झाले. या गैरसोयीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावात साधा पहिलीचा वर्ग सुध्दा नाही. काही वर्षांपूर्वी येथे मतदान केंद्र ठेवण्यात येत होते. कालांतराने केंद्र बंद करण्यात आले असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.

लाईव्ह ट्रेन्डस न्युजचा पाठपुरावा
सर्वात अगोदर लाईव्ह ट्रेन्डस न्युज ने हिवरीदिगर गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतून करावा लागतो जिवघेणा प्रवास हि बातमी प्रकाशित करून वास्तव समोर आणले. तर वाघूर नदीतील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होत असून अधूनमधून पुर परीस्थिती असल्याने शाळेत मुलांना जाता येत नसल्याने चारमहिन्यांपासून विद्यार्थी शाळेत गेले नाही. दळणवळणाच्या साधनासाठी जिव धोक्यात घालून वाघूर नदीतून प्रवास करावा लागत आहे.

– कोट
पंचवीस वर्षे फरशी पुलाची जुणी मागणी असून वेळोवेळी शासनस्तरावर त्याचबरोबर लोकप्रतिनिधींकडे निवेदने दिली आहे. पण या प्रश्नाला दुर्लक्ष केले आहे. पाऊसाळ्यात गावाचा इतर गावांशी संपर्क होत नाही. रूग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाता येत नाही. वारंवार च्या त्रासाला कंटाळून सर्व ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सामुहिक निर्णय घेतला आहे.
– रमेश त्र्यंबक पाटील, ग्रामस्थ हिवरीदिगर

Protected Content