मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागितला जात असतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून वगळण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृतीसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं, या हेतूने शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे नामकरण केलं. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचीही स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तकं ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून हा प्रकार समोर आला आहे. बालवयातच विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा समजावी, यासाठी इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला. मात्र आता हा जाज्वल्य इतिहासच शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे.
इयत्ता चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना 1991 मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी विरोध झाल्यानंतर चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर झाला होता. शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया यांचा समावेश इतिहासाच्या पुस्तकात केलेला दिसत नाही. केवळ ‘भारतीय लोक’ या पाठामध्ये शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची छोटेखानी माहिती आहे.