शेंदूर्णी येथे जोरदार पाऊस : वीज पुरवठा खंडित

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथे आज जोरदार पावसाने हजेरी लावली असून पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण शेंदूर्णी काळोखात आहे. याचाच फायदा घेऊन भुरट्या चोऱ्या व वाहन चोऱ्या वाढल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, शेंदूर्णी हे ४० हजार लोकवस्तीचे गाव असून येथील नागरिकांना गेल्या एक महिन्यापासून सतत खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परंतु सदर प्रकरणी विद्युत मंडळाचे स्थानिक वायरमन पासून वरीष्ठ अधिकारी वर्ग सुद्धा विद्युत ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथिल नागरिकांमध्ये विद्युत वितरण कंपनी विरुद्ध कमालीचा रोष आहे. याविषयी माहिती घेतली असता शेंदूर्णी सारख्या नगरपंचायत क्षेत्रात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ दखल घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाही बरेचसे कर्मचारी हे आजूबाजूच्या खेड्यावर तर अधिकारी शहरात राहतात. त्यामुळे शेंदूर्णी करांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना वेळ नाही.

 स्थानिक ठिकाणी नेमणूक असतांना अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विद्युत पुरवठा कर्मचारी जर नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसतील व ग्राहकांना सेवा पुरवत नसतील तर विद्युत वितरण कंपनीने अश्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता त्वरित गोठवावा किंवा त्यांच्या बदल्या तरी कराव्या जेणे करून पैसे देऊन विकत घेतलेल्या सेवेसाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, शेंदूर्णी सारख्या विद्युत वितरण कंपनीस महसुल मिळवून देणाऱ्या गावं व परिसरासाठी कार्यक्षम व स्थानिक निवास करून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व वारंवार खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठा अखंडितपणे ग्राहकांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी, अन्यथा नागरिकांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

 

Protected Content